Saturday, March 3, 2012

आज मै शुद्धीत हूँ |


बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ,
होश है पुरा मुझे, चड्डीत हूँ |

रातमें कल की हुआ था झोल थोडा,
आया किडा, केला नरड्याचा बोळ ओला,
चोळला झंडू, पिळला लिंबू, सद्दीत हूँ
बहुत दिनोंमे आज मै शुद्धीत हूँ.......

ना माशूक मेरी डॉट डॉट आहे, बॉस भी नहीं बीप बीप
माजही convert  झाला, औकात भी हुई है zip
घ्या मला, मारा माझी, आपकी मुठ्ठीमें हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |
  
मानता हूँ गुलजार सबका बाप है  
गालीबशी तुलना करू, क्या मेरी औकात है |
'धार' गेली, 'तार' गेली, खालच्या पट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ  |

वचन माझे क्रांतीचे और बोलबच्चन रातके
एक मेमो, और हातमें आ जाती है फाटके
घबरा घबराकेही सबकी गट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |

                                          अमोल जोशी. 

Tuesday, May 10, 2011

गावात काय आहे?




मी गावात राहतो. जन्मापासून. गावातल्या शाळेत शिकलो. कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो. ग्रॅज्युएट झालो. सेकंड क्लास मिळाला. घरची परिस्थिती बेताची.. ग्रॅज्युएट झालो तेव्हा वडील शेती करायचे. थकले होते. मी शेतीत कधी लक्ष घालतो याची वाट बघत होते. लवकरात लवकर कमवायला सुरूवात करायची होती. शेतीतही लक्ष घालायचं होतं. बरोबरचे काही मित्र पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्या-मुंबईला गेले. मी विचार केला, आपण गाव सोडणं बरोबर होणार नाही. शेती कोण करणार? आईवडिलांकडं कोण बघणार? शेती करायला सुरूवात केली. नोकरीचा शोध सुरू होताच. बरेच दिवस नोकरी मिळत नव्हती. सरकारी नोकरी मिळवण्याएवढी ऐपतही नव्हती आणि ओळखही. दोन वर्षांनी शुगर फॅक्टरीत लागलो. पगार विचारू नका.

गाव सोडलेले मित्र फोन करायचे. काहीजणांचं शिक्षण संपून चांगली नोकरी मिळाली होती. काहीजण उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर चालले होते. माझी नोकरी आणि शेती सुरू होती. नोकरी काही सरकारी नव्हती. ओळखीनं लागलेली. कागदावर नसलेल्या पण तोंडी मान्य केलेल्या अटी पाळाव्या लागायच्या. आजही लागतात. नोकरी टिकवण्यासाठी यांच्या मागेमागे फिरावं लागतं. सभांना जावंच लागतं. पटत नाही, पण घोषणाबाजी करावी लागते. नाहीतर कधी घरी बसवतील याचा नेम नाही.

गाव सोडलेल्या मित्रांचं मात्र माझ्यापेक्षा बरं सुरू आहे. शेड्युल टाईट असतं म्हणतात. पण ड्युटी संपली की ते त्यांच्या मर्जीचे राजे. आमचं तसं नाही. गावात ग्रुप तर इतके झालेत, की बोलता सोय नाही. बरच्या गल्लीचा गट, खालच्या गल्लीचा गट, काँग्रेसचा गट, मनसेचा गट..  गावातला प्रत्येक तरुण कुठल्या ना कुठल्या गटात आहे. गटाला नावं द्यायची, टी-शर्ट छापायचे आणि शायनिंग मारत फिरायचं... बरं करणार तरी काय.. ज्याच्याकडं नोकरी आहे, तो कमीत कमी सात आठ तास तरी कामात असतो. पण गावात उडाणटप्पूच जास्त आहेत. वेळ काढणार तरी कसा...  शहरातल्या मित्रांचं बरं आहे. त्यांचेपण ग्रुप आहेत. पण ते संध्याकाळी वगैरे कोल्ड कॉफी, ब्रेकफास्ट किंवा सिगरेट बिगरेट पिण्यासाठी एकत्र येतात. सुट्टीदिवशी ट्रिप वगैरे काढतात.... 

पण मला सुट्टी म्हटलं की अंगावर काटा येतो... दिवसभर करायचं काय? काय आहे गावात टाईमपासला? वेळ कसा काढायचा? राजकारणात आपल्याला रस नाही.. गावातल्या पोरांना भेटावं म्हटलं तर एकमेकाचा काटा काढण्याशिवाय यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो... बरं ग्रुपचं कौतुक इतकं वाढलंय, की दुसऱ्या ग्रुपमधल्या कुणाशी बोलावं तरी पंचाईत. ह्याच्याशीच का बोलत होतास, म्हणून आमच्या ग्रुपवाले जाब विचारणार... तुला काय करायचंय असं म्हटलं, तर साहेबांपर्यंत नाव नेणार... मग सगळ्यांनाच शंका... साहेबांना संशय आला, तर मग नोकरी सोडून बसा घरी... ज्याच्याशी बोललो त्याचीपण गोची. एका गावात राहून लोकांशी बोलायची चोरी झालीय. शहरातल्या मित्रांचं बरं आहे. ते कुणाशी बोलतात यावर त्यांचं पोट अवलंबून नाही... 
                

पण शहरातले मित्र कधीकधी भिकेचे डोहाळे लागल्यासारखं करतात. काल एकजण मुंबईहून गावात आला होता.. टिव्हीत कामाला आहे. बातम्या सांगतो... बोलता बोलता बोलला," तुम्ही गावात राहता. नशीबवान आहात... धावपळ नाही, गोंधळ नाही.. शुद्ध हवा. चांगलं अन्न... ताजं दूध..." त्याला म्हटलं की अख्खा जन्म शहरात गेल्यासारखा फिल्मी बोलू नको.. दिवसभर काय करायचं हा प्रश्न पडत असेल, तर ताजी हवा काय करायचीय? मला म्हणत होता की गावात खर्च पण कमी होतो. आता पैसेच नाहीत पोरांकडं तर खर्च करणार कुठून... गावातल्या पोरांचं शिक्षण बघितलं, तर बीए, बी.कॉम किंवा बी.एस्सी.. याच्यापुढं आणि याहून वेगळं जी शिकली, ती एकतर बाहेर पडली, किंवा त्यांचं बरं सुरू आहे. पण ९० टक्के जनता बीए, बी,कॉम आणि बी.एस्सी. नोकऱ्या मिळणार त्या पण पाच हजार, सात हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार.  त्याला पण वशीला पाहिजे...आणि पाच दहा हजारात काय होतंय हल्ली? त्याला म्हटलं लेका तू मिडीयात आहेस, टीव्हीवर दिसतोस, लोक बघतात. पोटापाण्याचं टेन्शन नाही, सगळं सेटल आहे.  म्हणून तुला हे सगळं हवा, अन्न, ताजं दूध बिध आठवतंय. तर मला म्हणाला की गावाची ओढ काय असते, हे गाव सोडून गेल्याशिवाय कळणार नाही. गप्प बसलो. मनात म्हटलं की यांची जळत नाही, म्हणून बोलतायत

मला म्हणाला की मुंबई सोडून गावात राहायला यावं, असं वाटतं. मी म्हणालो आहेस तिथं बेस्ट आहेस. तिकडं कंटाळा आला, की वर्षातनं दोन चारवेळा गावाकडं यायचं... मोकळी हवा घ्यायची... शांत व्हायचं आणि पुन्हा निघून जायचं. यातच भलं आहे. नाहीतर आमच्यासारखी गत होईल... त्याला काही हे पटल्यासारखं वाटलं नाही. पण मित्र म्हणून आपलं काम आहे, खरं काय ते सांगायचं.. जाताना म्हणाला ये एकदा मुंबईला फोन करून.. म्हटलं बघूया. मागच्या वर्षी एकदा गेलो होतो त्याच्या घरी.. पण मुंबईत कुणाकडंही गेलो तरी आपण त्यांना अडचण करतोय असंच वाटतं.. म्हणून जाता जाता त्याला म्हणालो, "तू गावाकडं आलास की तुला परत मुंबईला जाऊ नये, असं वाटतं. पण आम्हाला मात्र मुंबईला आल्यावर कधी एकदा परत गावाकडं येतो, असं होतं."

Sunday, April 10, 2011

मी अँकर बोलतोय


ना मी मालक, ना संपादक
ना तारक, ना मारक मी
वेळेत येतो, वेळेत जातो
आज्ञाधारक अँकर मी.... //धृ//

चेह-यावरती थापुनी मेक-अप
वेळापत्रक करुनी चेक-अप
शिरतो मग मी स्टुडिओमध्ये
जंटलमनचा करूनी गेट-अप
अंगावरच्या कोटाआतील, भुलतो गंजीची भोके मी
हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी
वेळेत येतो, वेळेत जातो......१

काय जाहले, जरी मी सध्या
घरात राही भाड्याच्या ?
खडसावूनी या जाब विचारी
अध्य़क्षाला म्हाडाच्या
स्टुडिओमध्ये गुरगुरतो, पण ऑफिसमध्ये शेळी मी
बाता करतो हापूसच्या अन्, घरात खातो केळी मी
वेळेत येतो, वेळेत जातो...... २



पटले वा, ना पटले तरीही
अंगावर घेतो व्हीआयपी
फिरून तरी माझीच मारती
इतुकाही ढळता टीआरपी
विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मग गोटा मी
प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी
वेळेत येतो, वेळेत जातो....... ३

माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली
बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली
आज्ञा येता विष ओकतो, होतो मिठ्ठाळ पेढा मी
बोलविता कोणी वेदही बोले, ज्ञानोबांचा रेडा मी
वेळेत येतो, वेळेत जातो,
आज्ञाधारक अँकर मी......... ४

अमोल जोशी.

Thursday, February 24, 2011

बसायचे आहे








डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्पना लढवत इथल्या काही बाकड्यांवरचा आणि बोर्डांवरचा ‘ज्येष्ठ’ हा शब्दच खोडून टाकलाय.
या मैदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. मैदानात दिवसा क्रिकेट आणि रात्री फुटबॉल (प्रकाश कमी असल्यामुळे) खेळ सुरू असतो. बाजूला असणाऱ्या ट्रॅकवरून सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण पोटासाठी(पोट कमी करण्यासाठी) चालत किंवा धावत असतात. थोडक्यात मैदानावर आणि मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात. मात्र कॅलरीज जाळून झाल्यावर ज्यावेळी इथल्या बाकड्यांवर बसण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इथल्या तरुणाईचा प्रॉब्लेम होतो. बघावं ते बाकडं ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर उठावंच लागत असल्यामुळं तरुण अनेकदा हिरमुसताना दिसतात. त्यामुळं सौजन्य वगैरे गोष्टींना वैतागलेल्या काहीजणांच्या डोक्यातून आलेली ही बालसुलभ, हतबल आयडिया मैदानात गेल्यागेल्या नजरेत भरते.




या मैदानात किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडणारा नेहमीचा प्रसंग. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असं लिहिलेल्या बाकड्यावर काही तरूण मंडळी बसून गप्पा मारतायत. तेवढ्यात एखादे आजी-आजोबा किंवा दोन आजोबा किंवा आज्या तिथं येतात. गप्पा मारणाऱ्या मुलांकडे बघतात. तरुणांना काहीच न बोलता, काही क्षण तिथेच ताटकळतात. मग तरुण आपसूक उठतात आणि त्यांना म्हणतात, “बसा आजोबा. तुमच्यासाठीच हे बाकडं ठेवलंय.” आजोबा बसतात. मग तिथून दुसरीकडे जाताना आजोबांना ऐकू येणार नाही, अशा आवाजात एकमेकांत संवाद “आयला, यांच्यासाठी बाकडी.... आमच्यासाठी कधी बाकडी ठेवणार नाहीत.”





ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची गरज आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांची प्रत्येक ठिकाणी सोय होणं गरजेचंच आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण मग आम्ही बसायचं की नाही, की ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत आम्ही उभंच राहायचं, असा काहीसा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये पैसे खर्च न करता, फक्त तास दोन तास निवांत बसण्यासाठी तरुणांकडचे पर्याय कमी होत चाललेत. पैसे खर्च करून एखादा मॉल, हॉटेल किंवा कॅफे गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर कुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही.

लोकलमध्ये जागा मिळत नाही म्हणून, बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला आणि लगेच एखाद्या महिलेनं उठवलं म्हणून, बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक आले म्हणून, दुसऱ्या बागेत ‘कपल’ला प्रवेश नाही म्हणून, रेल्वे स्टेशन आणि बसस्टॉपवरची बाकडी कधीच मोकळी नसतात म्हणून तरुणांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय उरलेली नाही. कधी नियमात बसत नाही म्हणून तर कधी सौजन्यात बसत नाही म्हणून, उभंच राहावं लागतं. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.