Friday, January 4, 2013

बलात्कार – एक मानवी भावना



एक आटपाट जंगल होतं. रोजच्या मानानं जंगलात आज भलतीच घाई सुरू होती. जंगलात आज प्राण्यांचा जाहीर टॉक शो होणार होता. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या सूत्रधारापासून पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची यादी जाहीर झाली होती. समस्त प्राणी परिवाराबरोबरच माणसाचा प्रतिनिधी म्हणून मिडियाला बोलावण्यात आलं होतं. जंगलातल्याच एका मोकळ्या जागेत स्टेज उभारण्यात आलं होतं. त्याच्या आजूबाजूचा परिसर अभ्यागतांच्या आसनव्यवस्थेसाठी साफसूफ करण्यात आला होता. प्राण्यांनी हळूहळू बसून घेतलं, गोंधळ कमी कमी होत गेला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

लांडगा - नरांनो आणि माद्यांनो, नमस्कार. या विशेष टॉक शो मध्ये आपलं स्वागत. मानवजातीकडून प्राण्यांच्या होणाऱ्या बदनामीचा निषेध करण्यासाठी आणि मानवाला त्याची चूक दाखवून देण्यासाठी या टॉक शोचं आयोजन करण्यात आलंय. प्राण्यांकडं पाहण्याचा मानवी दृष्टीकोन पहिल्यापासून कलुषित होताच. आता मात्र प्राण्यांची बदनामी करण्याची मोहिमच जणू मानवानं उघडल्याचं दिसतंय. हे असं का होतंय? यामागं कुणाचा हात आहे? यासारख्या प्रश्नांची उकल करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी मान्यवर पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केलंय वाघ, कुत्रा, कबुतर आणि माणूस यांना. तर माणसा, मानवजातीकडून प्राण्यांची विनाकारण बदनामी केली जाते, हा आरोप तुला मान्य आहे का?
माणूस – मुळीच नाही. मुळात तुम्ही पाहुणे म्हणून मला बोलावलंत, आणि इथं मात्र मला ये-जा करत आहात. यालाच रानटी वृत्ती असं आम्ही म्हणतो. मानव जात ही त्याच्याकडं असलेल्या सभ्यतेमुळंच प्राण्यांपेक्षा वेगळी ठरते. सुरुवातीलाच तुम्ही नरांनो आणि माद्यांनो असं म्हणालात. आमच्याकडं बंधुंनो आणि भगिनींनो असं म्हणतात. त्यातूनही एक सभ्यता दिसते.

वाघ – प्राण्यांना अशी तोंडदेखली नाती जोडण्याची गरज वाटत नाही. तोंडावर बंधूंनो आणि भगिनींनो म्हणायचं आणि वेळ आली की बंधुंनी भगिनींवर बलात्कार करायचा. प्रत्येक जातीत नर आणि मादी हेच दोन प्रमुख घटक आम्ही मानतो आणि त्यांचा आदरही राखतो.

माणूस – पण ही नाती आम्ही तोंडदेखली जोडतो, असं म्हणायला काय आधार आहे?

वाघ – दिल्लीतल्या तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार विसरलास?
माणूस – त्याचं काय?
वाघ – तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी एकानं तिला अगोदर कम ऑन सिस्टर असं म्हणून बसमध्ये बोलावल्याचं मी कुठंसं ऐकलं. एवढंच काय, तुमच्या डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या शहरात भावानंच सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचंही ऐकलं. नाही जमत नाती पाळणं, तर कशाला उगाच माद्यांना बहिणी वगैरे म्हणत असता?

माणूस – ठिक आहे. ठिक आहे. आपण विषय सोडून दुसरीकडं भरकटतोय. प्रस्तावनेत लांडग्यानं मूळ मुद्दा असा मांडला होता, की माणसांकडून प्राण्यांची बदनामी होते आहे. हा अत्यंत बालिश आरोप असून पब्लिसिटी स्टंट आहे, असा माझा उलटा आरोप आहे.

कबुतर – मी सांगतो या आरोपाचं कारण. माणसाच्या घरांच्या खिडक्या आणि गॅलऱ्यांमध्ये बसून मी प्रत्यक्ष पाहिलंय. जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा त्या कृत्याचं वर्णन पाशवी बलात्कार, मानव झाला पशू असं केलं जातं. बलात्कारासारख्या अत्यंत हीन कृत्याला प्राण्यांशी जोडणं हा प्राण्यांचा अपमान तर आहेच, शिवाय माणूस ज्ञातीच्या अज्ञानाचीही परिसीमा आहे.

माणूस – त्यात अज्ञानाचा प्रश्न कुठं आला? एखादा आरोपी एखाद्या महिलेवर अत्याचार करतो, तेव्हा त्यांना पाशवीच म्हटलं पाहिजे. रानटीच म्हटलं पाहिजे.

कुत्रा – पण का? पाशवी का? रानटी का?

माणूस – कारण असे प्रकार मानव जातीला शोभणारे नाहीतच. असे प्रकार जंगली प्रवृत्तीचे लोकच करू शकतात. अन्यथा, एवढा शिकलेला, पुढारलेला, सुसंस्कृत असलेला मानव बलात्कार वगैरे हीन गोष्टी का करेल?

कुत्रा – बलात्कार फक्त मानवच करतो.

माणूस – काय? वेड बीड लागलं की काय तुला?
कुत्रा – होय. मी म्हणतो ते 100 टक्के खरं आहे. आम्ही प्राणी आणि पक्षी कधीच आमच्या माद्यांवर बलात्कार करत नाही. जगात कुठलाच प्राणी बलात्कार करत नाही. त्यामुळं मनुष्य हा प्राणी आहे, असं म्हणण्याचीदेखील आम्हाला लाज वाटते.

माणूस – हाहाहा. कुत्र्या, तू हे बोलतोयस. तू? ज्याला अनेकदा रस्त्यात आम्ही भलत्यासलत्या अवस्थेत पाहतो. एका मादीसाठी चार-चार नर कुत्रे एकमेकांशी भांडत असल्याचं तर मी शाळेत असल्यापासून पाहत आलोय. आणि म्हणे प्राणी बलात्कार करत नाहीत.

वाघ – अरे अरे अरे. कीव येते रे तुझी माणसा. तुझ्या अकलेचा अगदी मीडियाच झालाय की. मादीला मिळवण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असणं वेगळं आणि मादीवर बलात्कार करणं वेगळं. मादी मिळवण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असतेच. आणि सर्व प्रजातींमध्ये असते. मात्र इतर नरांना हरवून मादी मिळाल्यावर आम्ही तिच्यावर बलात्कार नाही करत. आम्ही मादीला संभोगासाठी कन्व्हिन्स करतो. आणि ती तयार नसेल, तर कुठलाही प्राणी बळजबरीनं मादीशी संभोग करत नाही. तुम्ही माणसं, तुमच्या सोयीसाठी इंटरनेटवरून, सोशल मीडियातून प्राण्यांविषयी अफवा पसरवता आणि आम्हाला तुमच्या श्रेणीत आणून बसवण्याचा प्रयत्न करता. कारण सत्य जाणून घेणं तुमच्या सोयीचं नसतं.

कुत्रा – मनुष्य हादेखील एक प्राणी आहे, हे सत्य सध्या मानवासाठी बचाव आणि प्राण्यांसाठी शरमेची बाब झालीय.
लांडगा – माझा एक प्रश्न आहे. मनुष्य हा प्राणी असूनदेखील बलात्कार का करतो? जर प्राणी बलात्कार करत नाहीत आणि मनुष्य हा प्राणी आहे, हा दोन्ही बाबी सत्य असतील, तर मनुष्य बलात्कार करतो, ही बाब तर्कसंगत ठरत नाही.

कुत्रा – तर्काला न पटणाऱ्या गोष्टी करणं, हेच तर मानव जातीचं वैशिष्ट्य आहे. जे प्राणी ओठांनी पाणी पितात, ते शाकाहारी असतात, आणि जे जीभेनं पाणी पितात, ते मांसाहारी असतात, असा सर्वसाधारण तर्क आहे. इतर सर्व प्राण्यांच्या बाबतीत तो लागू पडतो. मात्र माणसाच्या बाबतीत नाही. निसर्गानं संभोगाची भावना नैसर्गिकरित्या प्राण्यांमध्ये निर्माण केलीय. पण बलात्कार ही संकल्पनाच मनुष्यनिर्मित आहे.

वाघ – खरं आहे. प्रत्येक प्राण्याचा वंश वाढावा, यासाठी निसर्गानं प्रजननाची सोय केली. मानवानं मात्र भ्रूण हत्येचा शोध लावला. प्राणी कधीच भ्रूण हत्या किंवा गर्भपात करत नाही. मानवी संस्कृतीचा प्रवास हा खरंतर निसर्गभावनेकडून विकृतीकडं झालेला प्रवास आहे. माणूस जितका माणसाळत गेला, तितका तो नीच आणि असंस्कृत होत गेलाय.
माणूस – माणसाळण्याचा आणि असंस्कृत होण्याचा काय संबंध?
कबुतर – याचं मार्मिक उदाहरण म्हणजे आदिवासी. आदिवासी हा माणूस असूनदेखील बलात्कार करत नाही. कदाचित त्याला अजून तुमच्यासारख्या सुसंस्कृत माणसांची हवा लागली नसावी.

माणूस – मला मान्य आहे. पण केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नराधम समाजात आहे. सगळ्याच पुरुषांना तुम्ही एका पारड्यात जोखू शकत नाही. आणि केवळ पुरुषांनाच दोष काय म्हणून? तंग कपडे घालून फिरणाऱ्या महिलांमुळं पुरुषांच्या भावना उत्तेजित होतात आणि असे प्रसंग घडतात. महिलांदेखील याची काळजी घ्यायला नको का? समाजात वावरताना, कपडे घालताना भान राखायला नको का?

कुत्रा – हा देखील मानवाचा एक नीच पुरुषी बचाव. अरे नराधमांनो, कपड्यांचा आणि बलात्काराचा संबंध असता, तर प्राण्यांमध्ये सर्वाधिक बलात्कार झाले असते. हा प्रवृत्तीचा प्रश्न आहे. कपड्यांचा नाही.

माणूस – अं...

लांडगा – चर्चेच्या शेवटी हाच निष्कर्ष निघतो आहे, की बलात्काराशी प्राण्यांचा तीळमात्र संबंध नाही. अशा घटनांना प्राण्यांशी जोडून माणूस प्राण्यांचा घोर अपमान करतो आहे. बलात्कार, अत्याचार आणि स्त्री भ्रूणहत्या या शुद्ध मानवी भावना आहेत. 

(www.24taas.com वर प्रकाशित)

1 comment: